प्रिय वाचकहो,
बुकगंगा तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक नवीन पुस्तक. सुप्रसिद्ध साहित्यिक माधव कोंडविलकर यांचे आत्मचरित्र, ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’.
ज्या पुस्तकाने माधव कोंडविलकर यांना साहित्यिक म्हणून ओळख दिली, मराठी साहित्याला मोलाचं योगदान केलं, त्या अमूल्य कलाकृतीची, ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ या आत्मचरित्राची पहिली आवृत्ती जशीच्या तशी पुनर्प्रकाशित केली आहे. कोंडविलकर यांची कन्या डॉ. ग्लोरिया अमोल खामकर यांनी. त्यांच्या 'सोनिया-ग्लोरिया प्रकाशन' द्वारे हे आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहायला ज्यांनी आग्रह केला आणि प्रोत्साहन दिलं, त्या सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. मधु मंगेश कर्णिक यांना हे पुस्तक माधव कोंडविलकर यांनी अर्पण केले आहे.
‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ या पुस्तकाचा सुमारे नव्वद पृष्ठांचा मजकूर प्रथम १९७७ च्या ‘तन्मय’ दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला. त्यानंतर या पुस्तकाची पहिली आवृत्ती ‘मॅजेस्टिक प्रकाशन’ने जुलै १९७९ मध्ये, दुसरी आवृत्ती 'ग्लोरिया प्रकाशन'ने एप्रिल १९८७ मध्ये, आणि तिसरी आवृत्ती 'पॉप्युलर प्रकाशन'ने १९९४ मध्ये प्रकाशित केली.
या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयाचा पुरस्कार १९८४ साली मिळाला. या पुस्तकावर संशोधनपरप्रबंध (पीएचडी) झाले आहेत आणि अजूनही होत आहेत. शालेय आणि विद्यापीठीय अभ्यासक्रमांमध्ये हे पुस्तक अभ्यासाला आहे. हे पुस्तक भारतभर, इतकंच नव्हे, तर साता समुद्रापलीकडे गेलं आहे. सर्वश्री उत्तम कानिटकर यांनी हिंदी भाषेत ‘अन्त्यज’ या नावाने, श्री. अविनाश बिनीवाले यांनीही हिंदी भाषेत ‘मुकाम पोस्ट देवाचे गोठणे’ या नावाने आणि डॉ. गीप्वॉतव्हॅ यांनी फ्रेंच भाषेत INDE JOURNAL D’UN INTOUCHABLE या नावाने त्याचा अनुवाद केला असून ती पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.
'प्रकाशकाचे मनोगत' मध्ये डॉ.ग्लोरिया म्हणतात: "जाती व्यवस्थेचे आणि सामाजिक विषमतेचे विदारक दर्शन या आत्मचरित्रातून आपल्याला घडते. या पुस्तकातल्या अनुभवांचा काळ ५० वर्षांपूर्वीचा आहे. पण आजचीही परिस्थिती फार काही वेगळी नाही असे मला वाटते. भेदभावांचे स्वरूप फक्त वेगळे. दडलेले, दडवलेले. म्हणूनच हे पुस्तक कालातीत आहे."
‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ या पुस्तकासाठी आजतागायत वाचकांची पत्रं व अभिप्राय येत आहेत.
त्यातले काही निवडक अभिप्राय इथे देत आहोत:
जयवंत दळवी : “दलित जीवनाचा आविष्कार करणारी खूप पुस्तके आज मराठीत प्रकाशित झालेली आहेत. परंतु ज्यांना कलात्मक घाट आहे, ज्यांत समंजस असा संयम आहे, बुद्धीची प्रगल्भता आहे, अशी दलित आविष्काराची पुस्तके अवघी चार पाचच असतील. त्यात वरचा क्रमांक पटकावील असे ‘देवाचे गोठणे’ आहे. सर्वसाधारणपणे दलित लेखकांना धक्के देणारी भाषा वापरण्याची, घोषणावजा लेखन करण्याची सवय असते. कोंडविलकर त्या खळखळाटा पासून अलिप्त आहेत. त्यांच्या लेखनात सखोलता दिसते. त्यांची प्रकृती अधिक गंभीर, विचारी व संयमी कलावंताची आहे.”
पु.ल. देशपांडे : “मुक्काम पोस्ट-’वाचून पुन्हा एकदा अमानुषांच्या जगात आपण जगत असल्याचा अनुभव आला. ह्या अन्याया विरुद्ध उभ्या राहणाऱ्या शक्ती देखील जशा एकवटाव्यात तशा एकवटत नाहीत. त्यांतही फाटाफूट, ही परिस्थिती मनाला अधिक निराश करणारी आहे.”
गो. नी. दांडेकर : “किती सुंदर लिहिले आहे ह्या लेखकाने! हा लेखक उद्या, परवा कधी लिहायला लागला, तर किती चांगले लिहिल! हा फार मोठ्या ताकदीचा लेखक आहे.”
शांता शेळके :“हे आत्मचरित्रात्मक लेखन स्पष्ट, रेखीव, चित्रदर्शी आहे. अनुभव कसे नितळपणे मांडले आहेत. कुठेही भडक आक्रस्ताळेपणा नाही. किंवा वाचकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी चलाख युक्त्याही योजलेल्या नाहीत. हा संयम मला विशेष वाटतो. इतके सुरेख पुस्तक लिहिल्याबद्दल मराठी वाचकांनी लेखकाचे ऋणी व्हायला पाहिजे.”
रा. रं बोराडे : “मराठी साहित्याला ‘देवाचे गोठणे’ मध्ये ‘मुक्काम’केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही.”
सतीश आळेकर : “देवाचे गोठणे’ परत एकदा वाचून संपवले आणि सुन्न झालो. पण शेवटचे ‘राजापूर’ प्रकरण का वगळले? मुसलमानांच्या वस्तीत जागा मिळते हे सगळ्यांना कळायला पाहिजे होते. असो, या पुस्तकावर कधीतरी मला शक्य होईल तेव्हा चित्रपट काढायचा विचार आहे. एक माझे स्वप्न. बघुया कसे जमते आहे ते! मी प्रयत्नात आहे.”
विजयकुमार जोखे : 'देवाचे गोठणे’ ही मराठी कादंबरीची शान आहे. बाबा पद्मनजींच्या ‘अरुणोदय’ पासून सामाजिक आशयाला सुरुवात झाली. हरिभाऊ आपट्यांनी त्याला मध्यमवर्गीय यातनांतून नेले. पण आता अनुभूतींना धार आली आहे.”
रवींद्र पाटकर :“मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ रक्ताने लिहिल्यासारखे वाटते. म्हणून ते काळजाला जाऊन भिडते.”
अशोक देवदत्त टिळक : “काही गोष्टींचे सकौतुक आश्चर्य वाटते. पहिला सुखद धक्का याचा की, दलित व तिरस्कृत समाजात वाढून, वावरूनही आपले मन निर्ढावले नाही. आपल्यावर आणि आपल्या प्रियजनांवर होत असलेल्या अन्यायाची आणि जुलमाची चीड आपण सहज प्रवृत्तीने जोपासलीत. हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा पैलू फार मोठा आहे. खरोखर अमूल्य आहे.”
स्वामीप्रसाद पंडित : “अलीकडच्या काळातील हे एक अप्रतिम पुस्तक आहे. भाषा तर काय! किती सुंदर! जिवंत! नितळ! व्यंकटेश माडगूळकरांनंतर अशी भाषा कुठं दिसली नाही. वाचून आनंद झाला.”
नामदेव ढसाळ :“मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ म्हणजे एक महाकाव्यच आहे!”
बाबा कदम :“माधवराव, आम्ही शाईनं लिहितो. मात्र तुम्ही रक्तानं लिहिता!”
मधु मंगेश कर्णिक :“माधवराव, आता ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ माझ्या मनासारखं झालं आहे!”
तब्बल ४२ वर्षांनी हे पुस्तक पुनर्प्रकाशित होत आहे. पुस्तकाचे अतिशय बोलके मुखपृष्ठ तयार केले आहे पंकज भिवाजी यांनी. पुस्तकाची किंमत फक्त ३५० रुपये.
हे पुस्तक वाचा. भेट द्या. ही अजरामर कलाकृती अधिकाधिक वाचकांपर्यंत, नव्या पिढी पर्यंत पोहचवायला मदत करा.
हे ई-बुक विकत घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा:
https://www.bookganga.com/R/8CW18